सड येचायला:
सड येचाय
विनायक कदम:९६६५६५६७२३
उनाळी पाऊस ढासाळल की रानातनी म्हिनतीला जुपी व्हायची. कुणाला उसाच, कुणाला, हाब्रेटच, कुणाला मकयाच, कुणाला बागायती कशाचतर रान तयार कराय सुरवात व्हायची. सारा बैलांचाच कारबार. नांगुर,फन, कुळव, पंका, इचडी, ना ना तरची आवजार.
चैतातच चार नायतर सा बैलाचा नांगुर घालून शेतकरी रानाच पॉट फाडून काढत हुता. मी मी म्हणणारी रगिल बैल गुडग्याव याची. नांगुर गुडग्याच्या मापान लागायचा. आरडून ढेकळ फाळावन बाजूला पडायची. सा बैलांच्या माग नांगरीवाला, तीन बैलकी, आणि नांगरीमाग गोमा, बेडक, साप, कीड खायाला कोतवाल, बगळ आवत सुटुस्तर मागन हालायची न्हायत.
कोतवाल लय लापाट. बैलक्याच्या जवळ यिउन झडप घालाय त्यो हायगय करत न्हाय. नांगारल्याल घव, हार्बर,मक्याचं रान दोन म्हयन चापून ऊन खायाच.नांगरट झाली की शेतकऱ्याला उनाळी सुट्टी मिळायची. मग लग्न ठरीव, घर बांधाय काड, कवा कवा बैलाची जोड बदलायचा. लिकी,सूनाबाळी हेंच्याकडन हिंडून याच, आंब , जुंधळ, कडधान्य, शेतातल पिकल्याल पय पावण्यासनी दयाच.
कुरुड्या ,भातुड्या , चटण्या, लुंची बाया घालायच्या. पोर मामाच्या गावाला याची. पवाय, झाडावनी चडाय शिकायची. पिवळ हाडुळ झाल्याल आंब पोरांची वाट बगत लोम्बकळत बसायचं. आंब्यान झाड भरली की घरादारातनी आंब्याची शेंनसड. घरातनी चगाळ घालून ठेवल्याल्या आड्यांच घमघमाट सुटायच. आंब्याचं देखणंपण बगून तेला खाया पेक्षा नुसतं बगत बसू वाटायचं.
तवा उनाळी पाऊस मजी हुबाल पडायचं. ईजचा कडाडान धडाडा हुन काळ ढग भ्या दावायचं. आता चुपतूय का मग चुपतूय आस व्हायचं. गंभीर वातावरण झालं की वारा जुपी करायचा. लोकांची घरं, छपर, गंज्या, बुचाड आत्राळी व्हायची. आर दार झाका म्हणुन मानस आरडायची. तवर घरात वार घुसून भिंगरी उटायची. कवा कवा छपराच्या मिडी,कळाक मुडून म्हसरांच्या आंगावणी पडायचं.
जनावर आरडायची. आणि वरुणराजा निष्ठुर हुन सुपान पाणी वतायचा. खरी आब्दा व्हायची रानात घावल्याल्या गड्यांची. कोरड्याश्याला भाजीपाला,जळान काटूक डालग्यातन घिऊन घरला निगालेल्या बायांची पाचाव धारण बसायची. वार पाय उचलून दयाचा न्हाय आणि पाऊस थापडा दिल्यागत लागायचा. कूटतर झाडाखाली उबा राव्हाव तर झाडचं मायकल जॅक्सन गत नाचायच. त्याव इज पडायचं लय भ्या.
म्हसर, शेरड, आणि बैलगाड्या भरून वैरण घिऊन यायला लागल्याल्या माणसांची निबार आब्दा व्हायची. हुबाल पाऊस बगू बगुसतर वड्यासनी पाणी यिउन माणसांच्या वाटा बंद व्हायच्या. पावसात वार झाडाचं हाय न्हाय तेवड आंब खाली घ्यायच. मनसोक्त चुपुन झालं की गडी थांबायचा. रानातनी सारीकड पाणीच पाणी. रानाची तळी व्हायची . बांध, ताली फुटून चिंद्या उडायच्या. रानात घाटल्याल शेनखात रानात तरंगायच. वड्यानी खडूळ झार पाणी धाड धाड जागा घावल तिकडं पळायचं.
लोकांनी वड्याकडला घाटल्याल जळणाच फ्यास, लाकडं पाणी संग घिऊन याच. काय गडी पुरात शिरून वडन्या टाकून लाकडं धरायच. पाण्यातन खवळून आल्याल साप, गोमा, ईच्चू जागा घावल त्या झाडाव जीव वाचायला चडायचं. रांन घावल्यागत पाणी प्याच. ढेकळ पाक यिरगाळाची. रान भुसबुशीत हुन धान्याची वाट बगायचं.
उनाळी पावसान शेतकरी हारकायचा येळव काम व्हायची. मग फन कुळव घालून रान पूळीगत करायचा. फन कुळवाव बसायचं मजी लय भारी वाटायचं. बैलांच्या माग बगळ चिमण्या, कोतवाल रानातंन निगलेल्या प्राण्यांवर झडप घालायचं. बगळ तर साप आकंड गिळायच. फण कुळव मारल्याव सड ,काड्या, कस्पाट येचाय सारट धराय लागायचं. मामाच्या गावाला आल्याली पोर घावायची. सड यिचून ढीग लावून पेटवायचा नायतर फुटकी ताल बगुन त्यात टाकायचं.
यिचू चावा चावीच लय प्रकार व्हायचं. गावातनी दिशी आवशीद दिउन यिचू उतरायचा. रानात वल्ल्या मातीत पाय घालून केल्याल मातीच घर मोडायचा मजी काळजाच पाणी व्हायचं. मातीत खयोळ रंगायच. डालग भरून रानात भाकऱ्या, भाज्या, खरड,धय,चटण्या,कांद, भरीत, उसळी आंब, लोणचं जेवाण याच. काय खावं काय नगु घावल्यागत व्हायचं. ताट वाटीचा ताल रानात कुठला ओ. मांणस घावल तेज्याव घिऊन नायतर हाताव भाकरी घिऊन खायाची. त्यात,प्रेम, चव, गोडवा हुता.
झिंडू फोडणार ऊन आता न्हवत काळ कुट्ट आभाळ नुसतं वाऱ्यासंग वाह्याचं. कुकीळा आरडून आरडून टाळा फोडायची. माणूस स्वतःला जनावरासनी निवारा कराय चालू करायचा. तशी पाकर बी घरटी घालायची. जेची तेजी जुळणी चालू आसायची. पाण्याचं ढग फूड आणाय वार जीव तुडून व्हायाच. आताच्यागत आज बाजाराव जाऊन बी बेवळा आणून उदया पेरायच न्हवत. तर शेतात पेरायला बाया बी बेवळा वरीसभर राकत घालून ठेवायच्या. कूट कूट काय ठेवलय काडून पिरणीची तयारी व्हायची. कामाच तलाल उटायचं.ठराविक भाग सोडला तर आज रानातली ती धांदल, प्रेम ,गोडवा गावाकडं बी संपत चाललाय.
फोटो सौजन्य:गुगल